
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नाशिक ः विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन हेमलता पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रवेशानंतर दीड महिन्यानंतरच हेमलता पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र’ केला होता. आता हेमलता पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. एक वर्षांच्या आतच तिसर्या पक्षात हेमलता पाटील प्रवेश करत आहेत.
याबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना हेमलता पाटील म्हणाल्या, काँग्रेसमध्ये मी 35 वर्षे काम केले आहे. सहावेळा नगरसेविका म्हणून काँग्रेसकडून निवडून आले आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून फसवल्याची जाणीव झाली. यंदा निवडणुकीचे तिकीट नाकारले तो अपघात नव्हता. तो घातपात होता, आणि तो ठरवून केलेला. अशा पद्धतीने माझा राजकीय बळी दिला गेला. नंतर मी काँग्रेससमध्ये राहणार नाही, हा निर्णय घेतला.
शिंदेंच्या पक्षात शिवसेना स्टाइल प्रवेश झाला होता. मला प्रवेशाची कल्पना नव्हती. अचानक प्रवेश झाला. परंतु, ज्या लोकांमुळे माझा प्रवेश झाला, ते हितचिंतक होते. त्यामुळे मी काही बोलू शकली नाही. शिवसेनेत प्रवेश केल्यावर पाच ते सहा दिवसांत मला त्या पक्षात काम करता येणार नाही, हे सांगितले. आमची जडणघडण शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारांत झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला काम करण्याची चांगली संधी मिळेला. मी या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारी नाही, असे हेमलता पाटील यांनी सांगितले.
दिल्लीत एका कार्यक्रम होता. तेव्हा, आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पतीसोबत गेले होते. यावेळी गळ्यात शिवसेनेचा गमछा टाकण्यात आला. शिवसेनेची काम करण्याची एक वेगळी स्टाइल आहे. परंतु, नाशिकमध्ये अंतर्गत गटबाजी होती. त्यामुळे मला काम कसे करायचे हे लक्षात येईना. शिवसेनेत काम करू शकणार नाही, हे माझ्या लक्षात आले, असे हेमलता पाटील यांनी म्हटले.
मी अजितदादांकडे कुठल्याही पदाची मागणी केली नाही. विधानसभा निवडणुकीत मला राजकारणातून संपवण्याचा विषय होता, असा आरोपही हेमलता पाटील यांनी काँग्रेसवर केला आहे.


