
साई द्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार आणि अॅड. धनंजय जाधव मित्र मंडळाच्या वतीने संगीतमय श्री साई चरित्र कथेच्या समारोपप्रसंगी समाधी सोहळ्याचे वर्णन ऐकून भाविक भावूक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची भूमि ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. श्री संत साईबाबा च्या श्रद्धा आणि सबुरी या मंत्रांचा प्रत्येकाने जप करावा. अंधश्रद्धेला बळी न पडता समाजासाठी आपले काहीतरी देणे लागते या भावनेतून सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आपले कर्तव्य पार पाडावे. हभप समाधान महाराज शर्मा यांच्या मधुर वाणीतून साक्षात साईबाबांचे दर्शन घडण्याचे काम अहिल्यानगर वासियांना झाले आहे. संतांमध्येच देव पाहिले पाहिजे संतांच्या विचाराशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, साईबाबा यांनी समाजामध्ये केलेल्या कार्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा. जेव्हा आपल्याला दुसर्याचे चांगले करता आले नाही तरी चालेल पण आपण दुसर्यांचा वाईट करू नका. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
या साईबाबांच्याच जीवनावर आधारित संगीतमय श्री साई चरित्र कथा साई द्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार आणि अॅड. धनंजय जाधव मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. समारोपप्रसंगी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी श्री संत साईबाबांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन रसाळ शैलीत केले. बाबांनी देह ठेवताना घेतलेला अखेरचा श्वास, समाधीच्या वेळी झालेला भक्तांचा विलाप, आणि बाबांनी दिलेला श्रद्धा व सबुरीचा संदेश ऐकून भाविक क्षणभर स्तब्ध झाले. सर्वजण अश्रुपूर्ण डोळ्यांनी समाधी सोहळ्याचा अनुभव घेत होते. त्या क्षणी प्रत्येक भक्ताने आपल्या हातात दिवा प्रज्वलित करून बाबांच्या प्रकाशाने आमचे जीवन उजळो हा संकल्प केला. जणू शिर्डीचे समाधी मंदिरच अहिल्यानगरात अवतरले असल्याची अनुभूती प्रत्येकाला आली. यावेळी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी प्रतिपादन केले की साईबाबा हे संत नव्हे तर सर्व भक्तांचे खरे आधार आहेत. त्यांनी आपल्या जीवनातून आधी करून दाखवले आणि मगच समाजाला सांगितले. गोरगरीबांना प्रसाद दिल्याशिवाय त्यांनी कधीच भोजन घेतले नाही. त्यांची उदी आजही भक्तांचे दुःख हरते. श्रद्धा आणि सबुरी हेच बाबांचे मूलमंत्र आहेत. संतांमध्येच देव पाहिला पाहिजे, हा विचार प्रत्येकाने मनामध्ये दृढ करावा. असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी साईकथा आयोजकांचे कौतुक करताना म्हटले की, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात एकोपा, एकजुट आणि सकारात्मक विचार निर्माण होतो. साईबाबांच्या जीवनावर आधारित कथा ही केवळ भक्तीसाठी नाही, तर ती प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणारी आहे. अॅड. धनंजय जाधव यांनी साईकथेद्वारे समाजात श्रद्धा, सबुरी आणि भक्तीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज अहिल्यानगरमध्ये भक्ती आणि धार्मिकतेचा उत्साह उंचावला आहे. समाजातील तरुणाईसाठी हा एक प्रेरणादायी संदेश आहे. माझ्या मते, अशा कार्यक्रमांनी समाजात सद्गुण पसरवण्याचे कार्य चालू राहावे. अॅड. धनंजय जाधव यांनी भक्तीच्या माध्यमातून समाजात धर्म, संस्कृती आणि मानवतेचा संदेश पोहोचवला आहे. यामुळे समाजातील प्रत्येक घटक या कथेच्या अनुभवातून सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. याच ऊर्जेतून पुढील वर्षी शिवपुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे.
या समारोप सोहळ्यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, राजाभाऊ कोठारी,अशोक महाराज जाधव,भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उद्योजक गौरव फिरोदिया,आयोजक अॅड. धनंजय जाधव, अनिलभाऊ बोरुडे,निखिल वारे,संजय ढोणे,गणेश कवडे,अनिल ढवण,बाळाराम महाडकर,दिनानाथ जाधव , प्रसाद गुरु, पोपटराव कुलकर्णी,बाळासाहेब भुजबळ,ज्ञानेश्वर काळे,शशांक कुलकर्णी,अमोल निस्ताने,करण डापसे ,चैतन्य जाधव ,सोमनाथ जाधव,स्वप्निल दगडे,अमित महाराज धाडगे,राहुल मुथा,मितेश शहा ,पुरुषोत्तम सब्बन,ज्ञानेश्वर दौंडकर,स्वप्निल अंकम,अशोक फलके,विशाल माने,सचिन कांबळे तसेच अनेक मान्यवर आणि हजारो साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


