संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता शहरी भागातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा १७ ऑगस्टपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी सांगितले. शाळा सुरू करण्यासाठी विशेष समिती नेमली असून, या समितीच्या सूचनेनुसार शाळा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. काही जिल्ह्यांमध्ये मध्यंतरी शाळा सुरू झाल्या होत्या. तर काही जिल्ह्यांमध्ये दीड वर्षांपासून विद्यार्थी घरी आहेत. त्यामुळे ते क्लासरूमचे वातावरण विसरले आहेत. त्यांना पुन्हा त्या वातावरणात आणणे आवश्यक आहे. राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागामध्ये १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळा आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.
शाळा सुरू करताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन योग्यरित्या करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शाळा सुरू करण्यासंदर्भात विशेष समिती स्थापन केली असून, ही समितीकडून मिळणार्या सूचनांनुसार शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. १५ जुलैला शाळा सुरू झाल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील बहुतांश पालकांनी शाळा सुरू करण्याचे मत मांडले होते.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन ज्या भागामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे अशा भागामध्ये समितीने दिलेल्या सूचनेनुसार शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असणार्या शहरी भागांमध्ये सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.



