शिशु संगोपन संस्थेच्या विद्यार्थ्यांची रॅली ठरली सर्वांचे आकर्षण
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात, नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमाणसात रहावी, या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यभरात राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम जिल्ह्यात उत्साहात राबविण्यात येत असून या उपक्रमात शिशु संगोपन संस्था सहभागी होत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या जागृतीसाठी शहरातून भव्य रॅली काढून नागरिकांच्या मानात देशभक्ती ज्योती प्रज्वलीत केली आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.

शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया, श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल, महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने राष्ट्रीय एकात्मता रॅली व हर घर तिरंगा रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, कोतवालीचे पो.नि.संपत शिंदे, चेअरमन दिलीप गुंदेचा, व्हाईस चेअरमन दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, खजिनदार अॅड.विजयकुमार मुनोत, विश्वस्त मनसुखलाल पिपाडा, एल.के.आव्हाड, नगरसेवक दत्ता कावरे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका योगीता गांधी, माध्य.मुख्याध्यापिका कांचन गावडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने आपणास स्वातंत्र मिळाले आहे. आज देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव साजरा होत असतांना त्या क्रांतीकाराप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला गेला पाहिजे. आज रॅलीच्या माध्यमातून या देशाभिमान जागृत ठेवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सांगितले.
या रॅलीमध्ये भारतमातेची प्रतिमा, मशाल, झांज पथक, रथ व स्वातंत्र्य सेनांनीची वेषभुषा केलेले विद्याथी, लेझिम, जवानांची वेशभुषा केलेले विद्यार्थी, ध्वजपथक, वेगवेगळ्या राज्याच्या वेशभुषा केलेले विद्यार्थी, तिरंगा टोपी पथक, क्रिडा पथक सहभागी झाले होते. चौका-चौकात या पथकाचे सादरीकरण करण्यात आले. नागरिकांनी या रॅलीचे उत्स्फुर्त स्वागत केले.
चौपाटी कारंजा येथे नगरसेवक गणेश कवडे यांनी तर दिल्लीगेट येथे शिक्षक संघटनेच्यावतीने पारुनाथ ढोकळे, नेता सुभाष चौक येथे युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी स्वागत करुन खाऊ वाटप केले. कोतवाली पोलिस स्टेशन येथे रॅली आल्यानंतर विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देण्यात आली. यावेळी कोतवाली पोलिस स्टेशनचे स.पो.नि.विवेक पवार, पीएसआय इंगळे, पो.ना.बाळासाहेब खामकर, गोरे, टकले, निपळे, इंगळे, भागवत, गाडिलकर, दुशिंगे, महिला पो.कर्मचारी अर्चना काळे, वर्षा सुद्रीक आदिंसह शाळेचे विश्वस्त, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


