संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : राज्यासह देशात गाजलेल्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे घडलेल्या तिहेरी खून प्रकाराणातील संजय, जयश्री व सुनील जाधव या मयतांच्या घरामधील वस्तू, कपडे जप्ती, संशयितांचे जबाबाचा दोषारोपपत्रात समावेश नसल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. हा बचावात्मक युक्तीवाद आरोपींच्या वकिलांकडून चार दिवस सुरू आहे.
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर जवखेडे खालसा तिहेरी खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपींच्या वतीने ॲड. सुनील मगरे, ॲड. नितीन मोने, ॲड छगन गवई, ॲड सिद्धार्थ उबाळे, ॲड अशोक चांदणे हे काम पाहत आहेत.
संजय, जयश्री आणि सुनील यांचा खून हा दि.२० ऑक्टोंबर २०१४ रोजी झाला. दुसऱ्या दिवशी (दि.२१) ही घटना पाथर्डी पोलिसांना मिळाली. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमलवार हे तातडीने घटनास्थळी पोहचले त्यावेळेस त्यांनी मयताच्या घराची पाहणी केली. त्यावेळेस त्यांना सुनीलचे पाकिट आढळून आले. या पाकिटात एका महिलेचा फोटो आढळून आला. त्यानंतर अनमलवार दुसऱ्यांदा पंचासमक्ष घराची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळेस सिमकार्ड, मयत सुनील यांचे पाकिट तसेच पाकिटात एका महिलेचा फोटो, आधारकार्ड, शैक्षणिक ओळखपत्र, तुटलेले बटण, चिलिमीचा तुकडा या वस्तू मिळाले, असे पंचांच्या साक्षीत आले आहे. या एका मुद्यावर आरोपींच्या वकिलांनी बचाव केला की, पोलिस निरीक्षक अनमलवार यांनी पहिल्यांदा घराला भेट दिली. त्यावेळेसच या वस्तू सापडणे नैसर्गिक होते. दुसऱ्यांदा घरी गेल्यावर या वस्तू सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हेतूपुरस्पर या वस्तूंचा पंचनामा करण्यात आला असल्याचा बचाव करण्यात आला.
हत्याकांडानंतर रक्तावर माती टाकण्यासाठी स्टीलच्या परतीचा वापर आरोपींनी केल्याचा दावा सरकारी पक्षाने केलेला आहे. हत्याकांड दि.२१ रोजी उघडकीस आल्यावर ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी परात, मयताच्या घराच्या कडीकोंडा आणि बल्ब याचे ठसे घेतले होते. त्यावर आरोपींचे ठसे मिळून आलेले नाही. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी (दि.२२) रोजी परात जप्तीचा पंचनामा केला आहे. वास्तविक दि.२१ रोजीच पंचनामा करणे आवश्यक होते, असे म्हणणे सादर केले.
या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी फिर्यादीने व्यक्त केलेल्या काही संशयितांच्या घराची झडती घेतली. संबंधित व्यक्ती या शेतकरी कुटुंबातील आहेत. शेतकऱ्यांकडे कुऱ्हाड, कोयता ही हत्यारे असतात, परंतु, या संशयितांच्या घरात ही हत्यारे मिळून आलेली नाही, याकडे ही लक्ष वेधले.
मयतांचे मृतदेहाची उत्तरीय तपासणी घाटी (औरंगाबाद) येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली. मयताचे कपडे दि.२३ ला रात्री ८ ते ८.३० वाजता पाथर्डी पोलिस ठाण्यात जप्तीसाठी आणण्यात आले. त्यावेळेच्या कपडे जप्तीच्या पंचनाम्यावरील पंचांनी ही बाब मान्य केली. या पंचनाम्यावर तपासी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक अनमलवार यांची सही आहे. पोलिस निरीक्षक अनमलवार यांनी साक्षीमध्ये ता. २३ सकाळपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जवखेडे येथे असल्याचे सांगितलेले आहे. पंच आणि पोलिस निरीक्षकांच्या साक्षीमध्ये तफावत असल्याकडे लक्ष वेधले.
👉कुत्र्याच्या मृत्यूचे रहस्य
अर्जुन वाघ यांचा ” पांड्या’ नावाचा कुत्रा होता. तो मयत जाधव यांच्या घराचेही रक्षण करत होता. या भागाकडे कोणी अनोळखी व्यक्ती असल्यास तो भुंकत होता. या तिहेरी खून प्रकारणाच्या तीन दिवस अगोदर रहस्यमय मृत्यू झाला आहे. वाघ यांनी कुत्र्याने काही तरी विषारी पदार्थ खाल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली होती. कुत्र्याच्या व्हिसेरामध्ये विषबाधा झाल्याचा उल्लेख नाही. या कुत्र्याचा घातपाताने मारल्याचा दावा आरोपींच्या वतीने करण्यात आला.



