संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपुर पांगुळ परिसरात महावितरणच्या वीज वाहक तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ऊस जळण्याचे सत्र सुरूच आहे. ऊस जळीतकांडात शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे, यामुळे साखर कारखान्यांनी चिंचपूर पांगुळ परिसरातील ऊस तोडणीवर लक्ष केंद्रित करावेत,अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
बुधवारी गावालगत बाबासाहेब नारायण बडे यांचा एक एकर क्षेत्रावर असलेला ऊस व त्यामध्ये केलेले ठिबक असा सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान शॉर्टसर्किट झाल्याने जळून खाक झाले आहे.
बुधवारी (दि.९) सकाळी ७.३०वाजेच्या सुमारास ही आग लागली. धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली. आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. यात बाबासाहेब नारायण बडे यांचा गट नंबर ७२/२ मधील एक एकर ऊस जळाला. या शेतकऱ्याचे अंदाजे लाख रुपयांचे नुकसान झाले. या एक एकर ऊसामध्ये पाणी देण्यासाठी ड्रीपचा वापर करण्यात आला होता. त्याचे साहित्यही जळून गेले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एक एकर ऊस जळाला आहे. असा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला आहे. या परिसरातील शिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये घर्षण होऊन उसाचे पीक ऐन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने या ओढवलेल्या संकटांमुळे शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यामधून केली जात आहे.
महावितरणने परिसरातील जिर्ण झालेल्या तारा तत्काळ दुरुस्त कराव्यात. तसेच साखर कारखान्याने वाढीव टोळ्या पाठवून लवकरात लवकर शेतकऱ्यांचा ऊस तोडून न्यावा. चिंचपुर पांगुळ परिसरात ऊस जळण्याची गेल्या एक महिन्यातील ही दुसरी -तिसरी घटना आहे. त्यामुळे याचे पंचनामे लवकर लवकर करून शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संकलन: सोमराज बडे



