संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या वाढीव संख्येचा घेतलेला निर्णय शिंदे सरकारने रद्द ते केला आहे. त्यामुळे या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

महाविकास आघाडी ठी सरकारच्या निर्णयानुसार जिल्ह्यात ८५ जिल्हा परिषदेचे गट तर पंचायत समितीचे १७० गण होते. त्याची आरक्षण सोडतही मागील आठवड्यात काढण्यात आली होती. आरक्षण सोडत काहींना सोयीस्कर तर काहींना अडचणीची ठरली होती. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण प्रक्रियेवर हरकतींचा पाऊस पडला होता. त्यामुळे फेरआरक्षणाची चर्चा सुरु झाली होती. त्यातच आता सदस्य संख्येचे गणितच बदलल्याने राज्य निवडणूक आयोग पुन्हा गट-गणांचे आरक्षण काढणार आहे. नगर जिल्हयात सध्याच्या रचनेप्रमाणे ८५ जिल्हा परिषद गट होते. तर २०१७ च्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेची गटसंख्या ७३ व पंचायत समित्यांची गणसंख्या १४६ होती. शिंदे सरकारच्या निर्णयानुसार आता लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद सदस्यसंख्या जास्तीत जास्त ७५ तर कमीत कमी ५० होणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ७५ की ७३ गट होतात, याकडे लक्ष लागले आहे.


