आपल्यामध्ये पत्रकारिता जिवंत ठेवायची असेल तर आज माध्यमांची चिकित्सा करणे काळाची गरज : पत्रकार सुधीर लंके
ॲड.प्रतापकाका ढाकणे मित्रमंडळाच्या वतीने पाथर्डी – शेवगाव तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : आपल्यामध्ये पत्रकारिता जिवंत ठेवायची असेल तर आज माध्यमांची चिकित्सा करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन दै.लोकमत अहमदनगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी केले.
ॲड.प्रतापकाका ढाकणे मित्रमंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पाथर्डी – शेवगाव तालुक्यातील मान्यवर पत्रकारांच्या आयोजित सत्कार व संघर्षयोध्दा कै.स्व.बबनरावजी ढाकणे साहेब जीवनपट दिनदर्शिकेच्या प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा पाथर्डी-शेवगाव तालुक्याचे नेते ॲड प्रतापकाका ढाकणे हे होते.
श्री लंके पुढे म्हणाले की, पत्रकारांचा सत्कार करण्यापेक्षा जो प्रिंट मिडियामध्ये उत्तम काम करेल, डेव्हलपमेंटसाठीच्या पत्रकारितेसाठी व जो मुलभूत प्रश्नांना हात घालतो आहे, अशा पोर्टलसाठी पुरस्कार द्या. लोकशाहीचा पत्रकारिता चौथा स्तंभ म्हणतो, उर्वरित तीन स्तंभ आहेत. ज्या कायदे मंडळात कायदे बनतात. संसद, विधानसभा कार्यकारी मंडळ आहे. जे कायद्याची अंमलबजावणी करते. न्यायपालिका आहे. कायदे आपल्या घटनेनुसार बनत आहे का? आणि कायद्याचे पालन कायद्यानुसार तंतोतंत होत आहे का? यांची शहानिशा न्यायपालिका पाहते, आणि माध्यम ही या तिन्ही स्तंभाची चिकित्सा करते. कायदेमंडळ निट वागते का? या तिन्ही स्तंभाची चिकित्सा माध्यम करतात. पण आपण पत्रकार म्हणून नीट वागतो आहे का? यांची चिकित्सा समाजाला करण्याची परवानगी आहे. माध्यमांना साॅन्सशिप आहे, तर याला पर्याय काय? याबाबत चर्चा झाली पाहिजे. पत्रकारिता हा व्यवसाय आज बनला, परंतु हे मिशन होते, असे ते शेवटी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा पाथर्डी-शेवगाव तालुक्याचे नेते ॲड प्रतापकाका ढाकणे म्हणाले की, राजकारणाच्या तु-तू, मे-मे पेक्षा पत्रकारिता करताना पत्रकारांनी दुर्लक्षित घटकांकडे व सामाजिक समस्या, विकासावरील बाबींवर टिप्पणी करून आम्हा राजकीय पुढाऱ्यांना जागृत करण्याचे काम केले पाहिजेत.
प्रास्ताविक संघर्षयोध्दा कै.स्व.बबनरावजी ढाकणे साहेब साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेशदादा ढाकणे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, उमेश मोरगांवकर, कैलास बुधवंत आदिंची भाषणे झाली.
दरम्यान, नव्याने निवड झालेले स्नेहल संस्थेच्या विश्वस्त संजय मेहेरकर, समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल नागनाथ गर्जे, महाराष्ट्र टिचर्स असो.तर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजीराव मरकड, सरपंच संघटनेच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शरदराव सोनवणे आदिंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.सभापती गहिनीनाथ शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, शहराध्यक्ष देव पवार, साहित्यिक हुमाहुमभाई आतार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सविताताई भापकर, मा.नगराध्यक्षा रत्नमालाताई उदमले, शिवसेनेचे भगवान दराडे, डॉ.राजेंद्र खेडकर, भाऊसाहेब धस, डिगबंर गाडेसर, किसनराव आव्हाड, बंडू पा.बोरुडे, महारुद्र किर्तने, बन्सीभाऊ आठरे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.



