संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – येथे भारतीय किसान संघाची महाराष्ट्र प्रांताची व्यापक बैठक नुकतीच झाली. या बैठकीचा शुभारंभ नांगर व दिप, प्रतिमा पूजन, ध्वजारोहण करून झाला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी अ.भा. कार्यकारीणी सदस्य कैलाश धक्कड (राजस्थान ), प्रांतध्यक्ष बळीराम सोळुंके, प्रदेश संघटनमंत्री दादा लाड, महामंत्री मदन देशपांडे व नाना जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी दोन दिवशीय व्यापक बैठकीत तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे काही ठराव, प्रबोधनात्मक मांडणी व संघटनात्मक कार्याचा गतवर्षाचा आढावा व पुढील वर्षाचे नियोजन असे स्वरूप होते.
बैठकीत विविध ठराव पारित करण्यात आले .

शेतमालाच्या खरेदीदारांकडून होणारी फसवणूक, पेमेंट बुडवणे , खरेदीदार गायब होणे आदिबाबत शेतमाल पणन अधिनियमातील तरतुदी शतकऱ्यांचे संरक्षण करण्यात सक्षम नाहीत. त्यात सुधारणा करावी. अंतिमत: राज्य शासनाने जबाबदारी स्विकारून पेमेंट आदा करण्याची जबाबदारी स्विकारावी.शेती पंपाला दिवसा पूर्ण दाबाने १२ तास वीज पुरवठा करावा. अन्यथा मागेल त्याला विनाअट सौर विज पंप ८० टक्के अनुदानावर उपलब्ध करावेत. ऊस एफ् आर् पी केंद्र सरकारचे नवीन निर्देशानुसार विनाकपात ज्या त्या वर्षीच्या ऊस साखर उताऱ्यानुसार कारखाना गळीत हंगाम बंद करण्यापूर्वी आदा करावी. याशिवाय काही विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली. त्यामध्ये
भरड धान्ये आणि त्यांचे मानवी आहारातील पोषण महत्त्व आणि राज्यात घटत चाललेले लागवड क्षेत्र याबाबत चिंता व्यक्त करून ते किसान संघाचे प्रयत्नातून क्षेत्र वाढवणे त्यावर प्रक्रिया उद्योग उभारणे त्याची मूल्य साखळी विकसित करणे याबाबात योजना बनवण्यात आली.
बीयाणे हा शेतीचा आत्मा आहे. दुर्मिळ होत चाललेल्या जाती व संपुष्टात येत चालले मौलिक वाण यांचे संवर्धन करणे व बियाणे बाबद शेतकऱ्याला स्वावलंबी बनवणे आदि विषयक कृती आराखडा बीज आयामा अंतर्गत बनवण्यात आला.
शेतकरी खऱ्याअर्थाने सक्षम समर्थ करण्यासाठी शेतमालाला लाभकारी मुल्य देणारा कायदा झाला पाहिजे या विषयी मांडणी झाली व ते प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करणे निश्चित केले आहे.
सर्व जिल्ह्यातुन आलेले पदाधिकारी यांनी गत वर्षी आपले जिल्ह्यात कृषी समस्या निवारणार्थ केलेले काम, संघटनात्मक स्तरात कार्यकर्ता प्रशिक्षण, अभ्यास वर्ग व किसान संघ ग्राम समितींचा विस्तार आदिबाबत वृत्त निवेदन व पुढील वर्षाचा संकल्प आदिची मांडणी केली गेली. यासह विविध विषयांवर उत्साहात व नवीन कार्य विस्तार व संकल्पाची प्रेरणा घेऊन कार्यकर्ते आपआपल्या कार्यक्षेत्रात परतले.


